Site icon सक्रिय न्यूज

ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले, ऑगस्ट महिन्यात होणार निवडणुका…..!

ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले, ऑगस्ट महिन्यात होणार निवडणुका…..!

बीड दि.२८ – पावसाचा फारसा परिणाम होणार नाही अशा भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना सर्वोच्च  न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने हवामान खात्याकडून अहवाल घेऊन राज्यातील तब्बल ६२ तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. यात बीड जिल्ह्यातील ३ तालुक्यांमधील १३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींसाठी  आता ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे .

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोना परिस्थितीमुळे लांबणीवर पडल्या होत्या. नंतरच्या काळात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे त्रांगडे निर्माण झाल्याने सध्या कोणत्याच पक्षाला स्थानिक निवडणुका नको आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयानेच निवडणूक आयोगाला पावसाळा असला तरी जेथे पावसामुळे निवडणूक प्रभावित होणार नाही अशा ठिकाणी तातडीने स्थानिक निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते . त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने आता हवामान खात्याचा अहवाल घेऊन ६२ तालुक्यांमधील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

              दरम्यान, बीड जिल्ह्यातील बीड (३ ) , गेवराई (५ ) आणि अंबाजोगाई (५ )  अशा १३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यातच या ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल तर १२ जुलैपासून निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे. 

शेअर करा
Exit mobile version