मुंबई दि.१६ – महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सर्व लाडक्या बहीणी सरकारच्या पाठिशी आहेत. ही योजना गेम चेंजर झाली आहे. परंतु विरोधक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले आहेत.
महाविकास आघाडी आमच्या सर्व योजना बंद करण्याची भाषा करीत आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचा हात लावला तर याद राखा. आमच्या लाडक्या बहिणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत, अशी तुफान फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच असेल हिम्मत तर मग होऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी…! असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
ओबीसीला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. पण या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाणारे कोण आहेत ? मराठवाड्यात मराठा समाजाला प्रथमच कुणबी प्रमाणपत्र मिळाली. त्यांच्यासाठी महामंडळ स्थापन केले. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलेले आरक्षण यांनी घालवले. मनोज जरांगे पाटील यांनी ओळखायला हवे की मराठा समाजाला फसवणारे कोण आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हणाला.
बुधवारी महायुती सरकारचा रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व महायुतीचे इतर नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, रिपोर्ट कार्ड देण्यासाठी धाडस लागते. काम करावे लागते. आम्ही प्रचंड कामे केली आहेत. दोन, अडीच वर्षांत तब्बल ९०० निर्णय घेतले आहे. जागा वाटपाची चर्चा योग्य दिशेने सुरु आहे. ते लवकरच जाहीर करणार आहे. आमचा मुख्यमंत्रीपदाबाबत काहीच घोळ नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यांच्यात घोळ सुरु आहे. आता त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा चेहरा ठरवावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, शासन आपल्या दारी योजनेतून पाच कोटी लोकांना लाभ मिळाला आहे. महायुती सरकारने दोन अडीच वर्षांत जे कामे केली आहे, ते समोर ठेवले आहे. दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहचवण्याच्या योजना आम्ही आणल्या आहे. १४५ सिंचन योजना आम्ही आणल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.