मुंबई दि.११ – दहावी बारावी परीक्षेच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्रीही उपस्थित होते.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत संवाद साधला. इयत्ता बारावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत ३,३७३ परीक्षा केंद्रावर तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च कालावधीत ५,१३० परीक्षा केंद्रावर होणार आहे. परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ ची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध असणार आहे. तर परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी; भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना दिल्या. यासह सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्याचे निर्देश, बैठ्या पथकाने परिक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास परिक्षा केंद्रावर पोहोचावे व परिक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे, संवेदनशील केद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिका-यांची बैठ्या पथकात नेमणूक करण्याचे आदेश, संवेदनशील परिक्षा केद्रांवर ड्रोन कॅमेराव्दारे आणि व्हिडीओ कॅमेराव्दारे पूर्णवेळ निगराणी करण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यातील परिक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त, बैठी पथके, ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे कार्यरत असावेत, यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिका-यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या असून परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संयुक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तर शहरी भागात पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी असणार आहे.
तसेच इंग्रजी भाषा, गणित व विज्ञान विषयांच्या परीक्षे दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वतः भेटी देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या असल्याने कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.