केज दि.१२ – मानवी जीवन हे अनेक प्रश्न, उत्तरे आणि अनुभव यातून भरलेले आहे. यात सुख दुःख, संकटे आणि संघर्ष अटळ असून अनपेक्षित आणि आपत्कालीन घडणाऱ्या घटनाही आहेत. यावर मात करण्यासाठी बी. एड. अध्यापनात झालेले संस्कार व शिस्त हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ. नागेश कराळे यांनी केले. ते भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय केज येथे बी. एड्. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर हे होते. तर प्रा. जयश्री कचरे, प्रा.उषा बलाढ्ये, सुजित नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. सौदागर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनातील बी. एड्. वर्ष हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे वर्षे जीवनाची दिशा ठरवणारे असून आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देणारे असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन विलास कांबळे यांनी तर आभार पूजा भोसले यांनी मानले. यावेळी बीएड अध्यापक छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

