बीड दि.७ – अपहरण झालेल्या दोन मुलींना बीड येथे स्वाधार गृहात ठेवण्यात आले होते. मात्र सदरील मुलींनी तिथून पळ काढला होता. परंतु वडवणी पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे.
वडवणी पोलीस ठाणे येथे 20 दिवसापूर्वी व पोलीस ठाणे दिंद्रुड येथील चार ते पाच महिन्यापूर्वी दोन अपहरणाचे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यामध्ये पीडिता असलेल्या दोन अल्पवयीन मुली सरकारी महिला स्वाधार गृह बीड येथे दाखल होत्या. मात्र दिनांक 07 जून 2025 रोजी सकाळी या दोन्ही अल्पवयीन मुली महिला स्वाधार गृहातून पळून गेल्या. याची माहिती वडवणीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांना मिळाली. अशा मुली शहराबाहेर गेल्या तर त्यांचा कुणीही गैरफायदा घेऊ शकतो याचे गांभीर्य ओळखून त्याचे शोधाबाबत अधिक तपास केला असता, या दोन्ही मुली विठ्ठल रखुमाई मंदिर, ग्रामसेवक कॉलनी बीड,परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून वडवणीचे दुय्यम अधिकारी पीएसआय चव्हाण यांना सदर ठिकाणी तात्काळ पाठवून त्या दोन्ही अल्पवयीन मुलींना थांबवून ठेवले व शिवाजीनगर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक श्री. पवार यांना माहिती देऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील स्टाफ बोलावला. दोन्ही मुली पुन्हा स्वाधारगृहात दाखल करण्यासाठी शिवाजीनगर महिला पोलिसांचे ताब्यात दिल्या.त्यानंतर त्या महिला स्वाधारगृहाचे यांचेमार्फत अध्यक्ष बालकल्याण समिती यांच्याकडे हजर करण्यात आल्या.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचे मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे हे.कॉ. रविंद्र गोवर्धन आघाव, शीतल केशव जोगदंड, पो.कॉ. बाळु बाजीराव राहाडे, नवनाथ बंडू डाके यांनी केली.

