बीड दि.२६ – दहावीचा निकाल लागून दीड महिन्याहून अधिक काळ झाला असला, तरी अद्यापही अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही. राज्यातील लाखो विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रतीक्षेत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा वाढत आहे. यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
मात्र, आता ही यादी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. 26 जून रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता ती चार ते पाच दिवस पुढे ढकलली जाऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. या विलंबामुळे चालू शैक्षणिक वर्षावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, सकाळी 11 वाजता अपेक्षित असलेली ही यादी आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जाहीर होईल अशी अपेक्षा होती. मात्र या संदर्भातील अधिकृत माहिती बोर्डाकडून कधी जाहीर होते, याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

