लातूर दि.११ – हैदराबाद गॅझेटिअर लागू करून सरकारने ओबीसी समाजाची घोर फसवणूक केल्याचे चिठ्ठीत लिहून एका ओबीसी समाजातील तरुणाने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रेणापूर तालुक्यात घडली आहे.
वांगदरी ता.रेणापूर येथील भरत महादेव कराड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठी मध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू केल्याने व ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्याचा डाव सरकारने रचल्याने ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात आले आहे. सरकारनेही ओबीसी समाजाची घोर फसवणूक केली असल्याचे भरत कराड यांनी म्हटले आहे. तसेच मी ओबीसी आरक्षणाच्या प्रत्येक लढ्यामध्ये सहभागी झालेलो आहे मात्र हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यामुळे ओबीसी समाजावर मोठा आघात झाला असून माझ्या नंतर तरी माझ्या कुटुंबियांना न्याय मिळावा असेही चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे.
दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला असून प्रत्येक समाजाचे संतुलन राखणे ही सरकारपुढे तारेवरची कसरत निर्माण झाली असून यावर चिंतन होणे गरजेचे आहे.

