Site icon सक्रिय न्यूज

महाराष्ट्रावर आता चक्रीवादळाचे संकट….!

महाराष्ट्रावर आता चक्रीवादळाचे संकट….!

Oplus_16908288

मुंबई दि.४ – भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी मोठी आणि अत्यंत महत्त्वाची धोक्याची सूचना जारी केली आहे. अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ निर्माण होत असल्याने 4 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात मुसळधार ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई, पुणे, ठाणे आणि संपूर्ण कोकण विभागासह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे संकट निर्माण होण्याची भीती आहे.                             चक्रीवादळाच्या धोक्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी हा इशारा तात्काळ लागू करण्यात आला आहे. 4 ते 5 ऑक्टोबर दरम्यान उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे जी वादळाच्या तीव्रतेनुसार 65 किमी प्रतितास पर्यंत वाढू शकते. या काळात समुद्राची स्थिती अतिशय खवळलेली राहणार असल्याने मासेमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे.
               केवळ किनारपट्टीवरच नव्हे तर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांतही पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. वातावरणातील आर्द्रता आणि ढगांची तीव्र निर्मिती यामुळे उत्तर कोकणातील सखल भागांत पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
                        दरम्यान, शक्ती चक्रीवादळाच्या इशाऱ्याला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारने सर्व जिल्हा प्रशासनांना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा त्वरित सक्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत. किनारी आणि सखल भागांतील नागरिकांसाठी स्थलांतर योजना तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी सार्वजनिक सूचनांकडे लक्ष द्यावे अतिवृष्टीदरम्यान सुरक्षितता बाळगावी आणि सागरी प्रवासापासून दूर राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शेअर करा
Exit mobile version