Site icon सक्रिय न्यूज

अहिल्यादेवी नगर डीपी जळाल्याने दोन दिवसांपासून अंधार…..!

अहिल्यादेवी नगर डीपी जळाल्याने दोन दिवसांपासून अंधार…..!

केज दि.११ – शहरातील भर वस्तीतून जाणाऱ्या उमरी रोडवरील दोन्ही बाजूच्या वसाहती मागच्या दोन दिवसांपासून अंधारात असून सदरील प्रभागातील रहिवाशांना अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे.

           शहरातील उमरी रोडवरील अहिल्यादेवी नगर, गणेश नगर, समता नगर, सहयोग नगर, द्वारका नगरी अशा प्रमुख वसाहतींना वीज पुरवठा करण्यासाठी अहिल्यादेवी नगर डीपी मागच्या कित्येक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे. कधी कमी दाबाने तर कधी उच्च दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने अनेकदा घरातील इलेक्ट्रॉनिक साधनही निकामी झालेली आहेत. वारंवार फ्युज जाणे आणि त्यामुळे चार चार तास विद्युत पुरवठा बंद राहणे हे तर नित्याचेच आहे. मात्र मागच्या एक महिन्यांमध्ये तीन वेळा डीपी जळण्याची घटना घडली असून दोन दिवस वीज पुरवठा खंडित राहत आहे. आताही मंगळवारी रात्री सदरील डीपी जळाल्याने बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस विद्युत पुरवठा बंद असल्याने नियमित कामामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सदरील प्रभागामध्ये नळ योजना नसल्याने रहिवाशांची संपूर्ण मदार ही बोअरच्या पाण्यावर आहे. तर दोन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पिण्याचे पाणी सुद्धा मिळणे कठीण झाल्याने पाणी असूनही विकतच्या पाण्यावर रहिवाशांना अवलंबून राहावे लागत आहे. पिठाची गिरणी तसेच इतरही विजेवर अवलंबून असणारी साधने बंद पडल्याने रहिवाशांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
                 दरम्यान सदरील डीपी जीर्ण झाली असल्याने व वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नेहमीच ही समस्या उद्भवत आहे. तरीही महावितरण कडून याची गांभीर्याने दखल घेतल्या जात नसल्याने वारंवार रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वस्ती वाढत चाललेली आहे मात्र महावितरण ची डीपी आहे तेवढ्याच क्षमतेची आणि ती ही जीर्ण झाल्याने विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. मात्र वाढीव क्षमतेची डीपी बसवण्याचा प्रकाश महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये पडत नाही याचे आश्चर्य वाटत आहे.
शेअर करा
Exit mobile version