Site icon सक्रिय न्यूज

सामायिक (सीईटी) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा 11 वी चा प्रवेश होणार अगोदर……! 

सामायिक (सीईटी) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा 11 वी चा प्रवेश होणार अगोदर……! 
मुंबई दि.29 – सन २०२० २१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) रद्द करण्यात यावी. तसेच इ. १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट इ. ११ वी मध्ये प्रवेश देण्यात यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे.
                      मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, इ. १० वी ची परीक्षा रद्द करण्याबाबत दि.१२ मे २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रक / प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले. तर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये इ. १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट इ. ११ वी मध्ये प्रवेश देण्यात यावा. सन २०२१-२२ या वर्षासाठी इ. ११ वी प्रवेशासाठी कार्यपध्दती ठरविण्यात आली आहे
          यामध्ये इ. ११ वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येईल.सदर सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल. सदर परीक्षा O.M.R. आधारीत असेल. सदर सामाईक प्रवेश परीक्षा १०० गुणांची राहील व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. इ. ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असेल.
इ. ११ वी ची प्रवेश प्रक्रीया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रीयेच्या पहिल्या टप्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.
                     दरम्यान सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहीलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील. सन २०२१-२२ या वर्षासाठी इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रीयेबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील असा शासन निर्णय राजेंद्र पवार (उप सचिव महाराष्ट्र शासन) यांनी निर्गमित केला आहे.
शेअर करा
Exit mobile version