Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने 6 जण दगावले तर पशुधनाचीही मोठी हानी…….!

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने 6 जण दगावले तर पशुधनाचीही मोठी हानी…….!

बीड दि.९ – गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जवळपास पूर्णच पिकांची वाताहात लागली आहे. त्याच बरोबर या नैसर्गिक आपत्तीत 6 जण दगावले असून 29 पशुधनाची हानी झाली आहे. तर 20 ठिकाणी घरांची पडझड झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

बीड जिल्ह्यात 4 सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णच उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर जिल्ह्यातील मोठ्या धरणाच्या पाण्याची पातळी देखील वाढली असून नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चार दिवसाच्या काळात वडवणी तालुक्यात बंधाऱ्यात वाहून जाऊन 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अंगावर भिंत पडून बीडमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच गेवराई तालुक्यात अंगावर भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

बीड शहराजवळच्या कपिलधार येथे वाहत्या पाण्यात एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या बरोबरच पशुधनाची हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. बीडमधील केज तालुक्यात पुराच्या पाण्यात तीन बैल वाहून गेले असून धारूरमध्ये एक, आष्टीमध्ये सहा शेळ्या, दोन बैल, दोन वासरू, एक म्हैस पुरात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. पाटोदा तालुक्यात एक वगार वाहून गेले आहे, गेवराई तालुक्यात पुराच्या पाण्यात एक गाय तीन बैल वाहून गेले असून जवळपास 1200 कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. तर शिरूर कासार तालुक्‍यात एक शेळी आणि 50 कोंबड्या वाहून गेल्या असून बीड तालुक्यात पाच शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.

शेअर करा
Exit mobile version