#Job

पोलीस भरतीला मंत्रिमंडळाची मंजुरी…….!

4 / 100

मुंबई दि.२९ – पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात आता 7 हजार 231 पदांची पोलीस भरती होणार आहे. पोलीस भरतीला आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.या भरती संबंधिची प्रक्रिया तात्काळ राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

                 या भरतीसाठी OMR आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्यातील पोलीस भरती ही दोन टप्प्यामध्ये करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील पाच हजार पोलीस भरती ही पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील सात हजार 231 पदांसाठीची ही भरती आता करण्यात येणार आहे. काही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या संबंधी प्रक्रिया त्वरीत सुरू करण्यात येणार असून तसे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना देण्यात आल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता या भरतीसाठी OMR आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकर भरतीची प्रक्रिया लांबली होती. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेलाही बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकाराने सुरू केलेल्या प्रक्रियेमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.

शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close