मागच्या अनेक दिवसांपासून सातत्याने मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणावर महापूर आल्याने शेती पूर्णपणे वाहून गेली आहे. तर नद्यांचे पाणी गावातही शिरून घरातील सर्वच संसार उपयोगी साहित्य उध्वस्त झाल्याने रोजच्या खाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. घरामध्ये, शेतीमध्ये पाणी जाऊन ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्या त्या गावात जाऊन अनेकांनी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या मात्र अद्याप पर्यंत काही मदत पोहोच झालेली नव्हती.
सदरील बाब सक्रिय न्यूज च्या माध्यमातून समोर आणल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी या गोष्टीची दखल घेत तात्काळ किराणा साहित्य वाटप करण्याचे ठरवले. आणि त्यानुसार राजेगाव, दैठणा, भोपला इत्यादी गावांमध्ये जाऊन गरजू गावकऱ्यांना किराणा साहित्य वाटप केले. त्यामुळे तात्पुरता का होईना पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, सरकारची मदत येईल तेंव्हा येईल मात्र अशाच प्रकारे मदतीचे हात पुढे येण्याची गरज असून केवळ त्यांचे सांत्वन न करता काही ना काही मदत होणे गरजेचे आहे. आणि हीच बाब लक्षात घेऊन रमेश आडसकर यांनी केज तालुक्यामध्ये पुढाकार घेतला आणि किराणा साहित्याचे वाटप केले. यावेळी बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे यांच्यासह दिलीप गुळभिले, ऋषिकेश आडसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते