बारावीचा निकाल कसा लावणार ? सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल……!

नवी दिल्ली दि.3 – सुप्रीम कोर्टात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी ऍड. ममता शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान केंद्र सरकारला दोन आठवड्यामध्ये बारावीचा निकाल कसा लावणार हे सांगा, असा अल्टिमेटम दिला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी देशातील आणि परदेशातील अभ्यासक्रमांचे प्रवेश महच्वाचे आहेत. तुम्ही तातडीनं निर्णय घ्या, गरज पडल्यास दररोज ऑनलाईन मिटिंग घ्या पण दोन आठवड्यामध्ये निर्णय जाहीर करा, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारकडून अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी ममता शर्मा यांची याचिका रद्द करण्याची मागणी केली. ममता शर्मा यांच्या याचिकेतील मागणी मंजूर झाली आहे, त्यांची याचिका रद्द करावी अशी मागणी केंद्राकडून करण्यात आली. मात्र, सुप्रीम कोर्टानं बारावीचा निकाल कसा लावणार हे सांगा, अशी विचारणा केंद्राला केली. त्यावर निकाल कसा जाहीर करणार हे सीबीएसई ठरवेल, असं केंद्राकडून सांगण्यात आलं.तसेच सुप्रीम कोर्टानं बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यासाठी निकष ठरवण्यात आले असतील तर कोर्टापुढं सादर करा, याचिका निकाली काढू असं म्हटलं. यावर आयसीएसईच्या वकिलांनी 4 आठवड्यांची वेळ मागितली. सुप्रीम कोर्टानं केंद्राची बाजू आणि आयसीएसईची बाजू ऐकून घेत 2 आठवड्यांची मुदत दिली. तुमची इच्छा असेल तर हे एका रात्रीत करु शकता.मात्र, दोन आठवड्यामध्ये निकालाचे निकष जाहीर करा. वेळ वाढवून देण्यासाठी युक्तिवाद करु नका, असं न्यायमूर्तींनी सांगितलं. न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्याकडे निर्णय घेण्यास वेळ होता, आता दोन आठवड्यामध्ये निकष जाहीर करा असं म्हटलं.तर ममता शर्मा यांनी अजून काही राज्य परीक्षा बोर्डांचा निर्णय झालेला नाही. राज्य बोर्डांनी सुद्धा बारावी परीक्षांसदर्भात एकसारखा निर्णय घ्यावा असं म्हटलं. यावर कोर्टानं बारावीचा निकाल जाहीर करण्याचे निकष सादर झाल्यावर याबाबत समजेल. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, ते सीबीएसईचे असोत, आयसीएसईचे असोत किंवा राज्य बोर्डांचं असोत, असं सुप्रीम कोर्ट म्हणाले.
- दरम्यान राज्य सरकारनेही बारावीची परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवला असून आज त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.