आपला जिल्हा
आता तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही….!
![आता तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही….! आता तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही….!](https://i0.wp.com/sakriynews.in/wp-content/uploads/2024/12/IMG_20241221_123433.jpg?resize=780%2C470&ssl=1)
बीड दि.६ – अन्याय झाला तरी नागरिकांना पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करायची म्हटलं की मोठं दिव्य पार करावं लागतं. त्यामुळे कित्येकदा तक्रारदार हे ठाण्यात जाण्याचंच टाळतात. मात्र आता पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी मोठा निर्णय घेतला असून नागरिकांना QR कोडच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहे.
बीड जिल्ह्यात नागरीक हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे बहुतांश वेळा त्यांना पोलीस स्टेशनशी संबंधीत काम असेल तर त्यांना पोलीस स्टेशनला पोहचायला बराच वेळ लागतो. त्याच बरोबर पोलीस स्टेशनला पोहचण्यासाठी बस भाडे/स्वतःचे वाहन असल्यास इंधन खर्च या स्वरुपात पैसाही खर्च होतो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बऱ्याच वेळा काम होत नाही. किंवा नागरीकांचे समाधान होत नाही. त्यामुळे नागरीकांना वरीष्ठांकडे दाद मागण्यासाठी दुरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरीकांचे आर्थीक नुकसान तर होतेच परंतु त्याच बरोबर त्यांना शारिरीक व मानसीक हालही होतात. याच बाबींचा विचार करुन व नागरीकांना चांगली सेवा देण्याच्या भावनेतुन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भा.पो.से.) यांचे संकल्पनेतुन संवाद प्रकल्प’ हा उपक्रम बीड जिल्हा पोलीस दलात राबवला जात आहे. यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भा.पो.से.) यांनी QR Code तयार केला आहे. सदरचा QR Code हा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचे कक्षात व पोलीस ठाणे अंमलदार यांचे कक्षात लावण्यात आला आहे. नागरीकांनी आपल्याकडे असलेल्या मोबाईलद्वारे सदरचा QR Code स्कॅन केल्यानंतर त्यांच्या मोबाईलचे स्क्रिनवर एक लिंक येईल. ती लिंक उघडल्यानंतर एक माहीतीचा फॉर्म येईल. त्यामध्ये नागरीकांना स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक, ज्या पोलीस ठाण्याच्या संबंधी काम आहे त्या पोलीस ठाण्याचे नाव निवडणे, पोलीस ठाणे येथे भेट देण्याचे कारण किंवा माहीती, पोलीस ठाणे येथे भेट दिल्यानंतर किंवा पोलीस ठाण्याच्या कामकाजावर आपण समाधानी आहात काय? समाधानी असमाधानी असल्याचे कारण, तुम्ही दिलेली भेट यावरुन पोलीस ठाणेस किती गुण द्याल? (गुण 1-5), सुधारणेसाठी सुचना इत्यादी माहीती भरुन ती सबमीट करणे आवश्यक राहील. एखादी व्यक्ती पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत असमाधानी असल्यास त्यांची पोलीस अधीक्षक कार्यालयाकडुन 24 तासांच्या आत समस्या जाणुन घेवुन समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. सदरचा QR Code हा सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सुद्धा नागरीकांपर्यंत पोहचवला जाणार आहे. त्यामुळे एखाद्या नागरीकास अवैध धंदे किंवा इतर महत्वाची गोपनीय माहीती द्यायची असेल तर ते सदरचा QR Code स्कॅन करुन माहीती देवु शकतात. अशा व्यक्तींचे नांव व मोबाईल क्रमांक गोपनीय ठेवले जाईल. तसेच याद्वारे नागरीकांना त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्या QR Code द्वारे देवु शकतात. नागरीकांनी केलेल्या तक्रारी, दिलेल्या प्रतिक्रीया, सुचना ह्या पोलीस अधीक्षक हे स्वतः पाहु शकणार आहेत. तसेच नागरीकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल पोलीसांकडुन घेतली जाणार आहे.
या उपक्रमाद्वरे पोलीस आणि नागरीक यांच्यात समन्वय साधाला जाणार आहे. यापुढे नागरीकांना विनाकारण पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही. यामुळे नागरीकांचा वेळ व पैशांचा होणारा अपव्यय टाळता येणार आहे. सदरचा उपक्रम हा नागरीकांच्या सेवेसाठी राबवीण्यात येत आहे.
दरम्यान, ‘संवाद प्रकल्प’ हा उपक्रम आज दिनांक 06/02/2025 रोजी पासुन बीड जिल्ह्यात राबवीला जात आहे. सदर उपक्रमाचा नागरीकांनी योग्य उपयोग करुन पोलीस व नागरीकांमध्ये निर्माण झालेली दरी दुर करावी. तसेच नागरीकांनी सुचवीलेल्या सुधारणांचे स्वागत केले जाईल असे मत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भा.पो.से.) यांनी व्यक्त केले आहे.