बीडमध्ये काँग्रेसचे गांधी पुतळ्यासमोर ‘सत्याग्रह आंदोलन’…..!

बीड दि. १४ – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हलदवानी (उत्तराखंड) येथील जाहीर सभेनंतर, हिंदुत्ववादी उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी त्या सभेच्या जागेवर गंगाजल शिंपडून शुद्धीकरण विधी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या आणि विकृत मनोवृत्तीच्या निषेधार्थ आज बीड येथील ऐतिहासिक गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवत “सत्याग्रह आंदोलन” करण्यात आले.
उत्तराखंडमधील घटनेने देशाच्या लोकशाही परंपरेला आणि संविधानाला गालबोट लावले असून, विरोधकांच्या आवाजाला अशा पद्धतीने हीन दर्जाचे गालबोट लावणाऱ्या भाजप व संबंधित संघटनांचा उपस्थित नेत्यांनी जोरदार समाचार घेतला. हे आंदोलन महात्मा गांधींच्या विचारांना स्मरून आणि संविधानाच्या रक्षणासाठी शांततापूर्ण मार्गाने छेडण्यात आले.
या सत्याग्रह आंदोलनादरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आदित्य पाटील, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे, प्रदेश सचिव दादासाहेब मुंडे आणि प्रदेश सचिव गणेश राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “मल्लिकार्जुन खरगे हे देशातील एका प्रमुख राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या सभेच्या जागेचे तथाकथित ‘शुद्धीकरण’ करणे ही केवळ एक व्यक्ती किंवा पक्षाचा अपमान नसून ही देशातील बहुजन आणि मागासवर्गीय समाजाच्या अस्मितेवर झालेली चिखलफेक आहे. काँग्रेस पक्ष अशा मनूवादी आणि जातीयवादी विचारसरणीला अजिबात थारा देणार नाही.” आंदोलनाला बीड जिल्ह्यातील काँग्रेसच्या विविध आघाड्या आणि मित्रपक्षांनी मोठा पाठिंबा दर्शवला. कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे, शहर अध्यक्ष इलियास टेलर, दत्ता कांबळे, शिवाजी कोटुळे, ॲड. गणेश करांडे, भीमशक्तीचे विद्यागर यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी यावेळी केंद्र व उत्तराखंड सरकारविरोधात घोषणाबाजी करत अशा जातीयवादी प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. केंद्र सरकारने या विकृत प्रकाराची गंभीर दखल न घेतल्यास संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही यावेळी उपस्थित नेत्यांनी दिला.