#Social
कायाकल्प फाउंडेशनचे महादुर्ग किल्ल्यावर श्रमदान….!

किल्ले धारूर दि. १६ – ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने ‘कायाकल्प फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने किल्ले धारूर येथील महादुर्ग किल्ल्यावर नुकतेच विशेष स्वच्छता व श्रमदान अभियान राबविण्यात आले. मात्र, एका बाजूला स्वयंसेवकांचे हे प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे पुरातत्त्व विभागाच्या विकासकामांत ऐतिहासिक वास्तूंकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे हा अमूल्य ठेवा संकटात सापडल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
श्रमदानातून परिसर उजळला
सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत कायाकल्प फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी महादुर्ग किल्ल्यावर श्रमदान केले. या मोहिमेत किल्ला परिसरातील बाभळीची काटेरी झुडपे, वाढलेले गवत आणि इतर अडथळे दूर करून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच, ऐतिहासिक प्राचीन विहिरीचा परिसरही नीटनेटका करण्यात आला. या अभियानात फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, केदार डुबे, कल्पक चिद्रवार, अंकुश फुटाणे, बालाजी सातभाई, अलंकार कामाजी आणि सोमनाथ आप्पाराव पवार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विकासाच्या नावाखाली वारशाची मोडतोड?
संस्थेचे स्वयंसेवक सातत्याने श्रमदानातून किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत असले, तरी सरकारी स्तरावर सुरू असलेल्या कामांबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत. पुरातत्त्व विभागामार्फत किल्ल्यावर जी विकासकामे केली जात आहेत, त्यात ऐतिहासिक अवशेष, जुन्या बांधकामांच्या पाऊलखुणा आणि प्राचीन रचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. “संवर्धन म्हणजे केवळ नवीन बांधकाम नव्हे, तर ऐतिहासिक वारशाचे मूळ स्वरूप जपणे होय,” असे मत इतिहासप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
पुरातत्त्व विभागाला निवेदन देणार
विकासकामांच्या नावाखाली किल्ल्याचा मूळ ऐतिहासिक वारसा बाधित होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित विभागाने तातडीने कामांची पाहणी करावी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक वारशाचे संरक्षण सुनिश्चित करावे, अशी मागणी कायाकल्प फाउंडेशनने केली आहे. यासंदर्भात पुरातत्त्व विभागाला लवकरच सविस्तर निवेदन सादर केले जाणार असून, महादुर्ग किल्ल्यावरील सर्व प्राचीन वास्तू आणि पाऊलखुणांचे जतन करूनच विकासकामे पारदर्शकपणे पूर्ण करण्याची मागणी संस्था करणार आहे.